नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी,सकाळी अकरा वाजता लोकसभेत आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. याआधी ४९ वर्षापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारी १९७० रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा प्रथमच लाल रंगाच्या ब्रिफकेसऐवजी लाल रंगाच्या मखमली कपड्यात अर्थसंकल्प त्या घेऊन आल्या. या नवीन पायंड्याबाबत संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार चर्चा सुरू होती.
सध्या २.७ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर असलेली भारताची अर्थव्यवस्था जगात सध्या पाचव्या क्रमांकावर असून,२०२५ पर्यंत ती पाच लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताची वाटचाल जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून,या वर्षी ती तीन लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाईल, असे सीतारामन यांनी नमूद केले.